विंचूरच्या व्यापाराची आठलाख रक्कम थोडक्यात बचावली
विंचूर ता.०३
येथील व्यापाऱ्याचा मॅनेजर शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी बँकेतून पैसे काढून नेत असतांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी मॅनेजरला दुचाकी आडवी मारून पैसे हिसकविण्याचा प्रयत्न केला. परंतु मॅनेजरच्या प्रसंगावधानाने रक्कम बचावली.
काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याचे विंचूर तीनपाटी येथे मोटारसायकल वरून जात असताना मागून आलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईलने सहा लाख रुपये असलेली बॅग चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास अजून सुरु असतानाच पुन्हा ही घटना घडत असतांना मॅनेजरने प्रसंगावधान राखले. मात्र या घटनेने व्यापारी वर्गात असुरक्षितता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
अशा घटना वारंवार घडत असल्याने विंचूरच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विंचूर येथील उपबाजार समितीचे कृष्णा ट्रेडर्सचे व्यापारी भारत उगलमुगले यांचा मॅनेजर संतोष जाधव हा ०३ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी येथील एचडीएफसी बँकेतून आठ लाख रुपये घेऊन येत असताना संतोष च्या पाठीमागून नंबर प्लेटला काळ्या रंगाची पट्टी लावलेली शाईन दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधलेली तिघेजण संतोष जाधव याचा तीनपाठीपासून पाठलाग करत आले. परंतु संतोष जाधव यांच्या दुचाकी बरोबर दुसरी एक दुचाकी असल्याने चोरट्यांना संतोष जाधवच्या दुचाकी जवळ जाता येईना. जाधव याने उपबाजार समितीकडे वळन घेतले असता चोरट्यांनी त्याच्या दुचाकीला दुचाकी आडवी मारून पैशाची पिशवी हिसकविण्याचा प्रयत्न केला. परंतु जाधव याच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा प्रयत्न फसला व चोरटे निफाडच्या दिशेने पळून गेले. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
विंचूर हे महामार्गावरील गाव आहे.येथे कांद्याची उपबाजार समिती असून कांद्याची मोठी उलाढाल होत आहे तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.