अत्यल्प भु धारक शेतकऱ्याची मुलगी बनली मुंबई पोलीस

जातेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
अत्यल्प भु धारक शेतकऱ्याची मुलगी झाली मुंबई पोलीस
(अरुण हिंगमिरे) बोलठाण
नांदगाव तालुक्यातील जातेगाव च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला, येथील अत्यल्प भु धारक शेतकरी मुक्तार सुपडु शेख यांची मुलगी सानिया (वय २०) हिने आपल्या वडिलांनी दिड एकर शेती आणि दुधाचा जोड व्यवसाय करुन हलाखीची आर्थिक परिस्थिती असताना वडिलांना आर्थिक हातभार लागावा हा दृष्टिकोन ठेवून जिद्द आणि चिकाटीने आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य दलामध्ये व वन विभागात व पोलिस दलात नोकरी साठी प्रयत्न केले, अखेर मुंबई पोलीस दलातील भरतीमध्ये यशस्वी झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून येथील असलेले सुमारे ५०० पेक्षा अधिक तरुण सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांची प्रेरणा घेऊन आपण ही विविध शासकीय नोकरी साठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली.परंतु यश आले नाही म्हणून प्रयत्न करण्याचे सोडले नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी जाहिरात निघाल्याचे सानिया हिला गावातील काही मैत्रिणी कडून माहिती मिळाली. तीने वडील मुक्तार आणि आई रुबीना यांची परवानगी घेऊन नोकरी साठी अर्ज दाखल केला होता.
त्यावेळी आई वडिलांच्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी नोकरी करण्यासाठी विरोध करत लग्नाचे वय होतं असून तीचे लग्न करण्याचा हट्ट धरला.पण सानीया ला आई वडील आणि इरफान व इम्रान हे दोन्ही भाऊ भक्कमपणे पाठीशी उभे असल्याने तीने आपल्या आईवडिलांना शेतातील कामात मदत करत वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करून व दररोज धावने, आणि इतर शारीरिक कसरत करणे कायम ठेवत जुलै २०२४ मध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी झालेल्या शारीरिक चाचणी मध्ये आणि जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या लेखी परीक्षेमध्ये यशस्वी झाली.
नोकरीला विरोध करणार्या नातेवाईकांचे अभिनंदनाचे फोन
मुंबई पोलीस दलात माझ्या मुलीची निवड झाली हा मेसेज मोबाईल वर आल्यावर तीने आपल्या परिवारातील सदस्यांना माहिती दिली. हा हा म्हणता ही वार्ता गावात समजली, गावातील तरुणांनी सानीया चा फोटो मोबाईल स्टेटसला ठेवून आणि प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.नोकरी करण्यासाठी विरोध करणार्या नातेवाईक देखील तीला फोन करून अभिनंदन करत असल्याचे तीची आई रुबीना यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना सानीया शेख स्वताचे उदाहरण देताना म्हणाली की, प्रत्येक तरुण -तरुणींनी आपल्या आई वडिलांचे कष्ट नजरेसमोर ठेवून त्यांना शक्य तितकें लवकर त्यांच्या खांद्यावरचा आर्थिक भार कमी होईल. यासाठी ध्येय नजरेसमोर ठेवून अभ्यास केला आणि शारीरिक परिश्रम घेतले तर निश्चितच यश मिळेल असे मनोगत व्यक्त केले.
सानीया मुक्तार शेख मुंबई पोलीस