
0
3
2
1
2
3
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची गरज – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
निफाड,दि.१७ मे:- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी बहुजन समाजाला मुख्यप्रवात आणण्यासाठी महत्वपूर्ण काम केले. अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी लढा दिला. त्यांचा आदर्श सर्वांनी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असे सांगत माणुसकी फाउंडेशनचे सामाजिक बांधिलकीचे व्रत अतिशय महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लक्ष्मी पतसंस्था सभागृह, उगाव रोड निफाड येथे माणुसकी सोशल फाउंडेशन आयोजीत श्री.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने समाजभूषण पुरस्काराचे वितरण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.माणुसकी सोशल फाउंडेशनचे सागर निकाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिवाजीराव ढेपले,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर,अनिल पाटील कुंदे, श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान अध्यक्ष ॲड सोमनाथ घोटेकर,ॲड.शेखर देसाई, प्रा.शरद शेजवळ, डॉ.श्रीकांत आवारे, डॉ.सुजित गुंजाळ, शिवाजी ढेपले, मधुकर शेलार, राहुल सोनवणे, कवी राजेंद्र सोमवंशी, किशोर वडजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे अभिनंदन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, हा फक्त एक पुरस्कार समारंभ नाही, तर हे एक साक्षात प्रेरणादायी क्षण आहेत ज्यामध्ये मानवी सेवेला, निःस्वार्थ कार्याला आणि समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेल्या जीवांना सन्मान आहे.आजचा दिवस हा त्या सर्वांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, ज्यांनी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजा महत्त्वाच्या मानल्या. ज्या व्यक्तींनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं, अशा व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपण ज्या संस्थेच्या वतीने हा सोहळा साजरा करत आहोत, ती संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाज परिवर्तनाचा वसा घेऊन कार्यरत आहे. माणुसकी सोशल फाउंडेशन वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.त्यांच्या या कामामध्ये सातत्य आहे.सामाजिक बांधिलकीचे त्यांचे हे व्रत अतिशय महत्वपूर्ण आहे. माणुसकी फांऊङेशनच्या वतीने आजवर पत्रकार दिन गुणगौरव सोहळा, गोर गरीब नागरिक, मंजूर उसतोड कामगार यांना कपड्यांचे वाटप,निराधार महिलांना साडीचोळी वाटप,थंडीचे दिवसात रेल्वेस्टेशनवर निराधार नागरिकांना ब्लँकेट वाटप ,सफाई कामगार महीलांचा सन्मान करण्यात येत आहे. जन्माला आलेल्या मुलींना मोफत कपङे व आईला साङी वाटप,तृतीयपंथीचा साङीचोळी देऊन सन्मान ,शहीद कुटुंबातील लोकांचा सन्मान असे विविध सामाजिक उपक्रम माणुसकी फांऊङेशन च्या माध्यमातून राबवले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्ती केवळ नावासाठी कार्य करत नाहीत. त्यांचं कार्य हा त्यांचा श्वास आहे. समाजातील वंचित,दुर्लक्षित, उपेक्षित घटकांसाठी ते आशेचा किरण बनले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. समाजासाठी काम करत असतांना त्यांनी समाजाचे अनेक प्रहार देखील सोसले. मात्र त्यांनी आपलं काम सुरू ठेवले. महात्मा जोतीराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. त्यांच्या पहिला पोवाडा देखील लिहिला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंधश्रद्धेपासून दूर ठेवण्यासाठी काम केले. अनेक कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला तसाच अनेक ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी त्यांच्यासोबत येऊन समाजासाठी काम केलं. महिलांवरील अन्याय दूर करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे हे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मी या संस्थेचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी हे कार्य ओळखून योग्य वेळी योग्य लोकांना सन्मानित केलं आहे. अशी सन्मान परंपरा ही समाजाच्या मनोबलासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा समाज कार्य करणाऱ्यांना मान मिळतो, तेव्हा त्यांच्यासोबत अनेक नवीन हात देखील उभे राहतात. “जे झाड सावली देतं, त्याच्या मुळांमध्ये कोणीच पाहत नाही. पण त्या मुळांच्या मेहनतीमुळेच फळं आणि फुलं येतात. आज आपण अशा मुळांचा सन्मान करत आहोत, ज्यांनी कोणताही गाजावाजा न करता समाजाला सावली आणि आशा दिली आहे.” आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक सशक्त, समान, आणि संवेदनशील समाज उभारू शकतो असे त्यांनी सांगितले.
0
3
2
1
2
3