Breaking
आरोग्य व शिक्षण

आला पावसाळा आरोग्य सांभाळा…पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

0 3 2 1 2 3

डॉ राकेश पाटील
जनरल फिजिशियन
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिक

पावसाळा जरा शेतीच्या हंगामाचा तसाच आरोग्यासाठी सावधानतेचाही काळ असतो. हा ऋतू मुलं, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांसह सगळ्यांनाच आवडतो. परंतु हा आनंददायी ऋतू अनेक आजार आणि संसर्गासोबत येतो ज्यांना वेळीच लक्ष देणे आवश्यक असते. टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, पोटाचे संसर्ग आणि अन्न विषबाधा यांसारख्या विविध समस्या सर्व वयोगटातील लोकांना त्रास देऊ शकतात. या लेखामध्ये पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी घ्यावयाच्या विविध खबरदारींची माहिती दिली आहे.पडणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत आजार वाढण्याची शक्यता त्यामुळेच अधिक असते. यासाठी आला पावसाळा आरोग्य सांभाळा असे सांगितले जाते.

पावसाळा हा आपणा सर्वांना हवा हवा असाच ऋतू आहे. मात्र याच्या आरंभीच्या काळात साधारणपणाने उन्हाळ्याने तापलेल्या जमिनीला पुरेसे पाणी मिळेपर्यंत जमीन ओलावा धरत नाही. साधारण पहिल्या चार आठवड्यात ही स्थिती असते. या काळात उष्मा मोठ्या प्रमाणात वातावरणात असतो आणि आलेल्या ढगांमुळे त्यात आर्द्रतेची भर पडते. हा काळ असह्य उष्म्याचा असतो. वाढलेला आर्द्रतेच्या परिणामी श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर त्रास होताना आपणास दिसतो. याच काळात एक प्रकारे आजारांची आपत्ती देखील सुरु होते असे म्हणावे लागते.

पावसाळ्यात अशी घ्या काळजी

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळा : अनेक हॉकर्स रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थ व फळांची विक्री करतात. हे खाद्यपदार्थ हानिकारक बॅक्टेरियांनी दूषित होऊ शकतात आणि पोटाचे संसर्ग किंवा जठरांत्रशोथ (गॅस्ट्रोएन्टेरायटिस) होऊ शकतात. आपल्याला पोटदुखी, क्रॅम्प्स, जुलाब, उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून या दिवसांत दूर राहणे चांगले आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्वच्छ आणि घरचे बनवलेले अन्न खा. फळे आणि भाज्या व्यवस्थित धुवा. पोटाच्या त्रासाचे कारण ठरू शकणारे कच्चे व शिळे अन्न खाणे टाळा.
उकळलेले पाणी प्या: पावसाळ्यात पाण्याचे स्रोत दूषित होऊ शकतात आणि यामुळे पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा धोका वाढतो. पाणी उकळून पिणे आवश्यक आहे आणि लांब प्रवास करताना पाण्याची बाटली बरोबर ठेवा.
घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका: डासांची पैदास डेंग्यू आणि मलेरियाला आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे घराजवळ पाणी साचू देऊ नका. पाण्याने भरलेल्या भांड्यांना, ड्रम्स आणि कॅन्सला वेळोवेळी रिकामे करा आणि स्वच्छ करा. याशिवाय, पिण्याचे पाणी भांड्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये झाकून ठेवा. मच्छरदाणीचा वापर आणि खिडक्या बंद ठेवणे पावसाळ्यात मच्छरांच्या चाव्यापासून बचाव करू शकते. सार्वजनिक स्रोतांवरुन पेयजल वापरले जात असेल तर पाण्यात शुद्धीकरणासाठी क्लोरिनयुक्त गोळ्यांचा वापर तसेच पाणी गाळून आणि उकळून पिणे आदी उपाय आपण आपणास आजारापासून दूर ठेवू शकतात.
पावसात भिजणे टाळा: पावसात भिजल्याने सर्दीपासून थेट न्यूमोनियापर्यंतचे विकार होण्याचा धोका या काळात असतो. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना त्यातून आजार होणार नाही, याचीही खबरदारी आपण घ्यावी. आजार, अ‍ॅलर्जी आणि संसर्ग टाळण्यासाठी छत्री किंवा रेनकोट ठेवणे आवश्यक आहे. आजारी लोकांच्या जवळ राहू नका कारण आपण देखील सर्दी आणि फ्लू सारख्या व्हायरल संसर्गांना बळी पडू शकता, जे पावसाळ्यात सामान्य असतात.
वैयक्तिक स्वच्छता राखा: घरी परत आल्यावर हात धुणे, ओले कपडे लगेच बदलणे, डॉक्टरांनी शिफारस केलेले अँटीफंगल साबण आणि पावडर वापरणे अशा चांगल्या हात स्वच्छतेचा सराव करा. पावसाळ्यात श्वसनाच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

ग्रीष्मात तापलेल्या जमिनीला चिंब करुन नव्याने हिरवाईचं लेणं देण्याचं सृजन करणारा हा वर्षाऋतूचा काळ याचा आनंद जरुर घ्या…मनसोक्त हिंडा, पावसाळी पर्यटन करा…चिंब व्हा, आनंद घ्या पण सोबत आरोग्याची संपन्नता महत्वाची हे मात्र विसरु नका. सृजन आणि संक्रमणाच्या या पावसाळ्यात ढगातून पडणाऱ्या पावसाइतकाच कवितांचाही पाऊस पडताना दिसेल… काहीच हरकत नाही पण जरा जपून इतकच सांगणं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे