भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी विशेष मोहीम
मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला व विंचूर संपर्क कार्यालय
राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरीकांना सर्वसामान्य जनतेप्रमाणे शिधापत्रिका वितरित करताना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील भटके विमुक्त समाजाचा व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मुलभूत अधिकार आहे. ही बाब विचारात घेता राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरीकांना नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सहानभूतीपुर्वक विचार करून त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी सुलभ कार्यपध्दती अनुसरून त्यांना पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देऊन त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यासाठी नवीन शिधापत्रिकेसाठी संदर्भ क्र.४ वरील दिनांक २९.०६.२०१३ अन्वये निश्चित केलेल्या प्रचलित पध्दतीनुसार आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरीकांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपुर्वक विचार करून त्यांना ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.
त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला व विंचूर संपर्क कार्यालयात दि.२४ जुलै ते २७ या कालावधीत भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून रेशनकार्ड चा लाभ घेण्यासाठी रहिवासासंदर्भात शहरी भागात नगरसेवक, ग्रामीण भागात सरपंच / उपसरपंच यांनी दिलेल्या त्या भागातील रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, आधारकार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र, कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहे. ज्या भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना शिधापत्रिका नाही अशा नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.