शेतकऱ्यांनी कृषी जोडधंदे करावेत : मा. मंत्री डॉ. भारती पवार
कृषि दिन निमित्ताने ॲग्रोकेअरचे “कृषि प्रेरणा पुरस्कार” वितरण
बेलगाव कुऱ्हे : बळीराजा शेतात घाम गाळून स्व कष्ठाने उत्पादन मिळवतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन मिळत नाही. शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता कृषी जोडधंदे करणे गरजेचे आहे, शेती पूरक व्यवसायातून आपली प्रगती साधावी, ग्रामीण भागात भरपूर संधी आहेत” असे प्रतिपादन माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले, १ जुलै कृषी दिन व ॲग्रोकेअर कृषिमंच संस्थेच्या १७ वा वर्धापन दिनानिमित्त १७ वा राज्यस्तरीय कृषी प्रेरणा व एक्सलन्स पुरस्कार २०२४” वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक तसेच मेघालया रीजनरेशन प्रोजेक्ट शिलॉंगचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, कृषी उद्योजक आनंद ॲग्रो उद्योग समूहाचे चेअरमन श्री उद्धव अहिरे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, कृषीभूषण ग्रोवर्स प्रोडूसर कंपनीचे चेअरमन भूषण निकम, ॲग्रोकेअर कृषीमंचच्या संचालक रोहिणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या शेतकरी कृषी उद्योजक, कृषी संशोधक व विस्तारक, सामाजिक क्षेत्रातील कार्य करणारे व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली, भूषण निकम यांनी प्रास्ताविक केले तर रोहिणी पाटिल यांनी आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न केला. याप्रसंगी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य व धान्य वाटप करण्यात आले तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी २ लाख २५ हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.