शिर्डीत भल्या पहाटे प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू, एक जखमी
एका संशयतास पोलिसांनी ताब्यात घेतले, दुसऱ्याचा शोध सुरु

भाऊसाहेब हुजबंद …
शिर्डी संस्थान मध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर एका ग्रामस्थांची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत. यामध्ये भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. तर अत्यवस्त ग्रामस्थावर प्रवरानगर येथे उपचार सुरू आहे. सुभाष घोडे हे साई मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते. तर साई संस्थांचे कर्मचारी नितीन शेजुळ हे ड्युटी संपवून घरी निघालेले होते. तर ग्रामस्थ कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटर सायकल वर आलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडून काही रक्कम हिसकावून घेतली. एवढ्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूने असंख्य वार केले. यात मंदिर चोपदार सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ प्रसादालय येथील कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचारी यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर कृष्णा देहरकर हे ग्रामस्थ गंभीर जखमी झालेले आहेत. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. या घटने प्रकरणी किरण सदाफुले या संशयतास ताब्यात घेतले आहे. तर राजू माळी हा संशय फरार आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली आहे.
या घटनेबाबत माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वी अशी घटना कधी घडलेली नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे फारसे लोक जागे नव्हते. याबाबतची माहिती सहा ते सात वाजेच्या दरम्यान मिळाली. दोन मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. शिर्डी मध्ये मोफत अन्नछत्र आणि त्यामुळे वाढती गुन्हेगारी रोजगाराच्या माध्यमातून लोक बाहेरून आलेले असावेत. आरोपी हे व्हाइटनर ची नशा करणारे असावेत. किंवा विकृत मनोवृत्तीच्या असावे.