गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करावे
: जिल्हाधिकारी जलज शर्मा
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा):
येणाऱ्या वर्षासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या समस्या लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन तयार करावे. तसेच गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची माहिती देखील ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत सादर करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी दिले आहेत.