
0
3
2
9
4
9
संत चरित्रावर आरोप-प्रत्यारोप काहीजण द्वेषातून करतात, तर काही अज्ञानातून करतात. परंतु साप्रंदाय परंपरेतील आमचेच तथाकथित चिखलफेक करतात. तेव्हा डोक्यात किडे पडल्यासारखे वाटते. संत म्हणजे -सत्-सत्य होय. जे सत्याचे उद्बोधक, संशोधक आहे त्यांच्या जीवनात असत् (विपरीत) घडूच शकत नाही. चमत्कार हा विषय संतांच्या खिजगणतीत नाही. चमत्कार हा शब्द ‘मायावी’ आहे. माया म्हणजे अघटित घटना घडवण्यात पटाईत असते ती माया होय. रावण हा ‘मायावी’ होता. त्याने निसर्गावर मात करून पृथ्वी, पाणी, तेज, वारा व आकाश तत्वावर अधिकार गाजवला होता. त्रिलोकाची सत्ता असुनही तो अपुर्ण होता. रावणाकडे जे तंत्रज्ञान होते ते आज 10% ही नाही. इंटरनेटचे मायाजाल तर होतेच पण ‘एआय’ आणि ‘क्वांटम’ तंंत्रज्ञान रावणाच्या घरी पाणी भरत होते. म्हणुन रावण ‘मायावी’ होता. मायावी तंत्रज्ञान घातकच ठरते. रावणाचे तसेच झाले. रावण हा ‘मायावी’ असेल तर राम ‘मायापती’ आहे. राम मायेचा नियंता आहे. माया ही श्रीहरीच्या अधिन आहे. ती श्रीहरीच्या चरणाची दासी आहे. संतांचे अतुट प्रेम हे ‘श्रीहरी’ म्हणजे रामावर आहे. म्हणुनच तर साधु-संत मायावी सिध्दिला (सिध्दि म्हणजे अलौकीक शक्ती) वश होत नाही किंवा सिध्दिला पुसतही नाहीत. म्हणुन संतांना चमत्कार मान्य नाही, किंबहुना चमत्कार थोतांड (मायावी) आहे असेच संत सांगतात. संत जीवनात चमत्कार म्हणून काही असेल तर ते देवालाच बघावे लागते. शक्तीची उपासना ही आपल्या ऋषीमुनी आणि संतांची खासीयत आहे. शक्ती ही उपासनेतील पहिली पायरी आहे. सारे विश्व चैतन्य (ऊर्जेने) भरलेले आहे. पिंडी ते ब्रम्हांडी असा क्रांतीकारी विचार संतांनी समाजाला दिला आहे. शक्ती अथवा उर्जा आपण म्हणतो ती, नविन निर्माण होत नाही अथवा ती नाश पावत नाही. सतत ही उर्जा रूपांतरीत होत असते. अखंड उर्जेचा प्रवाह हा अणु-रेणुंपासुन सजीव-निर्जिवात अखंड वाहत आहे. “अनुरणियां महतो महियान्”अशा या उर्जेचे (शक्तीचे) आपण अंश आहोत. विश्लेषक अथवा संशोधकांमध्ये मतमतांतरे असु शकतात. पाश्मिमात्य संशोधकांचे मत ‘चक्षु वै सत्यं’ असे असतात. परंतु वैदिक दर्शनात मात्र साधने, अनुमाने, प्रमेय व सिध्दांता बाबत “आचार्य वाक्य प्रमाणं” ही भुमिका स्विकारावी लागते. भौतिक प्रयोग अल्पश्रमात होतात, परंतु भौतिक आणि पारलौकिक विद्येचे प्रयोग सश्रध्द व विवेकसंपन्न अंत:करणाने अभ्यास करावा लागतो. “चाले हे शरीर कोणाचिया सत्ते । कोण बोलविते हरिवीण ॥” ज्यांनी व्यवहार आणि जग पाहिले आहे आणि जे कार्यकारणभाव जाणतात, ते स्वत:ला कर्ता करविता न समजता, मी निमित्तमात्र आहे व चालवणारा वेगळाच आहे,
असा संतांचा अनुभव आहे. सध्या जग हे ‘क्वांटम थिओसॉफी’ व ‘ए आय’ तंत्रज्ञानाच्या उंबरठ्यावर प्रवेश करत आहे. अज्ञात, अदृश्य व अनाकलनिय वस्तुस्थितीचे वर्णन शब्दानेच करावे लागते. म्हणुन ‘शब्देविण संवादीजे’ असे स्थुल, सुक्ष्म व कारणाच्याही पलिकडील तत्व जिणे जाणले जाते ती ‘दिव्यदृष्टी’ किंबहुना योगशास्त्रात जिला ‘ऋतुंभरा प्रज्ञा’ म्हणतात, तिचे प्रवेशद्वार म्हणजे ‘क्वांटम तंत्रज्ञान’ किंवा ‘ए आय’ तंत्रज्ञान म्हणणे उचित ठरेल असे वाटते.
विसाव्या शतकातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरिवन स्क्रॉडिंगर म्हणतो की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना क्वांटम तंत्रज्ञानाची प्रेरणा वेदांपासुनच मिळाली आहे. या ‘क्वांटम’ सिद्धांताच्या आधारेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इलेक्ट्रॉनिक व संगणक आधारित आहेत. या तंत्राद्वारे सुक्ष्म म्हणजे अणु, परमाणु व क्वार्क वगैरे अतिसुक्ष्म दुनिया समजावून घेता येते. परंतु याचे नियम खुपच विचित्र आहेत. ते समजणे तितके सोपे नाही. नवल हे आहे की ‘ए आय’ तंत्रज्ञान ऋषी, मुनी व संतांनी आपल्या जिवनात वापरले आहे. विश्वामित्र, विश्वकर्मा, अश्विनीकुमार, नारद, कण्वमुनी, अगस्त्यमुनी, भारद्वाज, दुर्वासऋषी, व्यास, सुश्रृत, आर्यभट्ट, गर्गमुनी, भास्कराचार्य, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानाचा जगातील सर्व संशोधक आधार घेतात. प्राचिन काळापासून भारतीयांनी विविध उर्जाशक्तीचा अभ्यास केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘असाध्य ते साध्य करीता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।’ अभ्यासाने, चिंतनाने योग सिध्दी, मंत्रसिध्दी, तंत्रविद्या, वस्तु सामर्थ्य सिध्दी, रसायन विद्या, परलोक विद्या तसेच ध्वनि विज्ञान वगैरे प्रणालीचा विकास केला. आरोग्यदायक, विधायक उर्जा संशोधित करून उचित मुल्यांचे संवर्धन केले. अनुसंधान द्वारा अनाकलनिय, अनंत अशा कर्तुम, अकर्तुम व अन्यथा कर्तुम महाशक्तीचे रहस्य संतांनी आपल्या समोर ठेवली आहेत. अॅटम म्हणजे अणु होय. अनुतूनच आपण ब्रम्हांडाची कार्यप्रणाली समजुन घेऊ शकतो. संत नामदेव महाराज म्हणतात ‘अणुरेणु माजी व्यापुनि राहीला । अनेकत्वा झाला एकलाचि॥’ म्हणजे अणुरेणुंनी व्यापलेल्या पिंडब्रम्हांडामध्ये उर्जा एकच आहे. या विश्वाची उत्पत्ती अणुंपासुन झाली हे आमच्या संतांना माहित आहे. तसेच विश्वाची उत्पत्ती अणुरेणुंपासुन झाली हा तर आधुनिक शास्त्रज्ञांचा सिद्धांत आहे. अणुचे परमाणु म्हणजे इलेक्ट्रॉन, न्युट्रॉन व प्रोटॉन आहे. यालाच वैदिक भाषेत सत्व, रज, तम असे म्हणतात. आता सिध्दांत असा की, दोन अणु, दोन पदार्थ, दोन व्यक्तींवर लागणारे बाह्यबल (कंट्रोल) त्या दोघांनाही एकमेकांत अडकवते किंवा त्या दोघांना एकमेकांत गुंतवून ठेवते, यालाच सायन्समध्ये ‘इगलमेंट’ म्हणतात. मग ते दोन अणु ब्रह्मांडात कित्येक प्रकाशवर्षे दुर असतील तरीही ते एकमेकांत गुंतलेले असतात. अणुमुळे गती आहे आणि स्पंदनशीलता आहे. अशा स्पंदनशिल व गतीशिल सृष्टीवर आपल्या विचारांचा प्रभाव पडतो. हे प्रयोगाने सिध्द झाले आहे. प्राणशक्तीच्या प्रक्षेपणाद्वारे सचेतन, अचेतन वस्तुला गतिमान करणे, अदृश्य (गायब) करणे, प्रगट करणे यात नवल असे काहीच नाही. जड अशा चुंबकलहरीद्वारे उपग्रह नियंत्रित होतो. तर सजीवच्या उर्जेने काय होणार नाही. दोन अणुंचे नियंत्रण म्हणजे ‘ईगलमेंट’ असे आधुनिक सायन्स म्हणत असेल तर यालाच संत तुकाराम महाराजांच्या भाषेत ‘गरूडटक’ म्हणतात. गरूडाची तिक्ष्ण दृष्टी सुक्ष्म, तेजसंपन्न आहे म्हणून श्रीहरीशी ‘ईगलमेंन्ट’ करतात. गरूडाची विनवनी करताना ‘गरूडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई । वेगी आणावा तो हरी । मज दिना ते उध्दरी ॥’ असे तुकोबाराय म्हणतात. आता ‘ईगलमेंट, गरूडटक’ यालाच वैदिक भाषेत ‘थर्ड आईज’ म्हणजे ‘तिसरा डोळा’ म्हणतात. असा ‘तिसरा नेत्र’ संत तुकाराम महाराजांना प्राप्त होता आणि म्हणूनच ते क्रांतिकारी बोलतात की, ‘अणु रेणु या धोकडा । तुका
आकाशा एवढा ॥’ वैश्विक विचारवंतांना चक्राऊन सोडणारे वाक्य आहे. दिव्यदृष्टी असुनही अर्जुन विश्वरूपाला पाहुन भांबवला होता. येथे तर असिम सुक्ष्माति सुक्षम तसेच विराटाचा देखिल तुकोबाराय अनुभव करतात. म्हणुन माऊली ज्ञानेश्वर महाराज किंवा संत तुकाराम महाराज हे दिव्यदृष्टी किंवा उर्जाशक्तीचे नियामक होते. ‘कुडीसहित गुप्त झाला तुका ।’ हा संत तुकाराम महाराजांचा स्वत: प्रमाण अभंग आहे. त्यांचे वैकुंठगमन असो अथवा संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘भिंत चालवणे’ असो याविषयी संगती लागते काय? ते आपण बघुया. यामध्ये ‘टेलिपथी व टेलिपोर्टेशन’ असे दोन भाग आहेत. ‘टेलिपथी’ म्हणजे कोणत्याही सामुग्री शिवाय संपर्क साधने. टेलिफोन अथवा मोबाईल शिवाय ऋणी, मुनी, संत एकमेकांशी संपर्क अथवा संवाद साधत होते. ‘आकाश’ या पंचभुताचा शब्द हा गुण आहे. शब्दध्वनीला ‘आकाशवाणी’ म्हणता येईल. ही आकाशवाणी ऐकण्याची, समजण्याची सिध्दी (तंत्र) संतांना अवगत आहे. आता ‘टेलिपोर्टेशन’ म्हणजे कोणतीही वस्तु एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी स्थान परिवर्तनाशिवाय पोहचवणे किंवा पाठवणे. अशीर समांतर सैध्दांतिक संकल्पना आहे. जसे स्पेस (ठिकाण) आणि वेळ यांचे इगलमेंन्ट (एकत्रीकरण) होते तसे पदार्थ (वस्तु) आणि उर्जा यांचे देखील एकत्रीकरण होते. वस्तुवर मनशक्तीद्वारे दोघांना एकमेकांत अडकवणे, गुंतवून ठेवणे, अदृश्य करणे अथवा प्रगट करणे हे शक्य आहे.
आता टेलिपोर्टेशन (स्थान परिवर्तनाशिवाय वस्तुचे दुसर्या ठिकाणी स्थलांतर करणे, होणे) ही कवी कल्पना राहिली नाही. तर पाश्चिमात्य सायन्स म्हणते की आम्ही अणु टेलिपोर्ट करू शकतो, पण कोणत्याही व्यक्तीला नाही. पण तेच पाश्चिमात्य वैज्ञानिक असे म्हणतात की भविष्यात व्यक्तीचे टेलिपोर्ट घडू शकते. आपले वैदिक विज्ञान हे प्रगत आहे. याचे उदाहरण म्हणजे नारद मुनी आहेत. एका जागेवरून दुसर्या ठिकाणी प्रगटणे किंवा अदृश्य (गुप्त) होत होते. हा इतिहास आहे. पण हे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. हे सिध्दा योगयुक्त महात्माच करू शकते. फोनवरून बोलणे हे एक प्रकारचे टेलिपोर्टेशन आहे. तुम्ही एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी क्षणात पोहचणे हे ‘विशेष तंत्र’ आहे. आताचे ‘ए आय’ तंत्रज्ञान हे एक ‘महामाया’ आहे. हे रामायण काळात प्रचलित होते. अघटित घटना घडवण्यामध्ये ‘माया’ पटाईत
आहे. या ‘ए आय’ तंत्रने मनुष्य स्वत:ला क्षणात घोड्याच्या रूपात बदलतो. तर कधी क्षणात साधुच्या रूपात बदलतो. याला मायावी तंत्र म्हतात. रामायणातील मारीच राक्षसाने स्वत:ला हरणाच्या रूपात बदलले होते. ‘ए आय’ तंत्राचा आधारवड ‘रावण’ आहे. म्हणुन रावण हा ‘मायावी’ आहे. तो कधी स्वर्गात जातो तर कधी गुप्त होत होता. तर लागलीच प्रगट होतो. प्रसिद्ध क्वांटम संगणक संशोधक पाश्चिमात्य शास्त्रज्ञ चार्ल्स बेनेट यांचे म्हणणे आहे की, सगळे विचार स्विकारण्यासाठी फार मोठे धाडस करावे लागते. तुम्ही या धाडसी गोष्टींवर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला अनेक विचित्र गोष्टींवर देखील विश्वास ठेवावा लागेल. तरच अविश्वसनीय शक्तीला नियंत्रित करून तिचा वापर करणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने देखील प्रवास करावा लागेल. आपल्यामध्ये आत्मविश्वास किंवा निश्चयाचे बळ पाहीजे. तरच शक्य आहे. सजा आपण कंपनीचे मालक आहात पण कामगारांवरच विश्वास नाही. तर कंपनी जास्त दिवस चालणार नाही. अगदी असेच मेंदुचे असते. ‘निश्चय’ आणि ‘स्थिरता’ ही ध्यानाने येते. यामुळे भावना व वासनांवर नियंत्रण होते. याचा परिणाम तो सिध्द अंत:चक्षु अथवा दिव्यदृष्टीने मुंगीचेही मनोगत जाणतो, स्वर्गाचा आलाप (आकाशवाणी) ऐकतो. एकाणी ठिकाणी बसुन तो सर्वत्र पहातो. अनेक ब्रह्मांडांना जाणतो आणि सर्वत्र भरून रहातो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अंत:ज्ञानाने त्या महापुरूषाला विविध आकारांचे, वासाचे, चवीचे, आवाजाचे होत असते. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांचे जिवनातील प्रसंग यापेक्षा वेगळे नाहीत. आपण भौतिक आणि अध्यात्मिक दृष्टीने विचार केल्यास आपल्या शरीरात पंचमहाभुते आहेत. त्यातील प्राण, उपान, समान, उदान व चान हे पंचप्राण आहेत. या पाच वायुपैकी ‘उदान’ हा वायु सर्वात ‘हलका वायु’ आहे. आपल्याला ‘हेलियम’ व ‘हायड्रोजन’ हे माहीत आहे. पण यांच्यापेक्षाही हजारपट हलका असा कमी घनतेचा ‘उदानवायु’ आपल्या शरीरात आहे. यातील विज्ञान असे की, अभ्यासाने उदानवायुचे प्रमाण वाढवता येते. यामुळे बाकीचे वायु क्षिण होतील. हे योगसाधकांना माहीत आहे. उदान वायु वाढवून शरीरात भरला तर शरीर हलके होईल. किंबहुना शरीराचे वजन कमी होईल. प्राणाच्या निरोधाविषयी विचार योग शास्त्रात आहे. योग शास्त्र अथवा वेदशास्त्राचा अनुभव मला माहीत आहे, असे संत तुकाराम महाराज ठामपणे सांगतात. कंठातील उदान वायुमुळे प्रतिलोम गती प्राप्त होत असते. उदानाची प्रतिलोम गती उर्ध्व (वर) आहे. उदानाची उर्ध्वगती सप्त स्वर्गाचे भेदन तसेच मोक्ष अथवा ईश्वरापर्यंत (वैकुंठ) आहे. उदानवायुमुळेच आपण व्यक्त होतो. प्रक्षेपित होतो. उदानातुन नाद, स्वर, ध्वनि, शब्दाची उत्पत्ती होते. कंठामधुन संचार, ध्वनि, शब्दाची उत्पत्ती होते. उदानाची ध्वनिकंपन (उर्जा) ही वस्तुला गतीमान करते. या गतीमुळेच उड्डाण होत असते. मग तो पदार्थ असो, मनुष्य अथवा विमानाचे प्रक्षेपण होत असते. कंठामधून शब्दध्वनि आकार घेतो. चार वाणीपैकी ध्वनिची समज परावाणीत असते. पश्यन्ति वाणीत हा अल्पस्वरात असतो. तर मध्यमा वाणीत कंठामध्ये तोच स्वर (नाद) आपल्या स्वत:ला ऐकायला येतो. हाच उदानवायु जेव्हा वैखरीत प्रवेश करतो तेव्हा तो शब्द ध्वनिने स्पष्ट व्यक्त होऊन वातावरणात संचार करतो. असा हा उदानवायु आत्म्याला बुद्धिशी, बुद्धिला मनाशी, मनाला इंद्रियांशी व इंद्रियांनी विषयाशी संचलित करतो आणि प्रक्षेपित होत असतो. संस्काराने संस्कारीत घेऊन साधक जे ग्रहण करतो. तेच उदानवायु व्यक्त करतो. झालेले संस्कारच परा, पश्यंति, मध्यमा व वैखरी वाणीतुन व्यक्त होतात. परवाणीत जे मंत्र किंवा नामस्मरण असते. तेच नाम वैखरी द्वारा वारंवार पुरश्चरण झाले तर उदानवायुच्या प्रेरणेने ती साधना होते. वारंवार उच्चार, स्मरण आणि नाम बोलण्याने शरीरातील अणु-रेणु प्रभारीत होतात. नामोच्याराने अणु प्रस्फुरित होऊन तो सुक्ष्मातुन स्थुलाकडे अभिव्यक्त होता. पिंड हा अनुमय असल्याने नाम हे शरीरात मुरते. नामस्मरण संपुर्ण शरीर आणि इंद्रिये व्यापुन टाकते. संत जनाबाईच्या गोवर्यातून विठ्ठल, विठ्ठल असा ध्वनि येत होता तर अर्जुनाच्या शरीरातुन देखील कृष्ण-कृष्ण ध्वनि ऐकु येत होता. संचारशक्तीचा (प्रक्षेपण) जनक उदानवायु आहे. त्याची देवता अग्नी म्हणजेच तेज आहे. तेजाची क्षमता, नादाची क्षमता किती आली केवढी पाहीजे हे विषयावर अवलंबुन आहे. उदानामुळेच स्वर शक्ती, गाणे गाणे, शिंक येणे अशा क्रिया घडतात. हे सर्व श्वासाशी संबंधित आहे. अहो, सामान्य शिंक आली तरी संपुर्ण शरीर हादरून सोडते. म्हणुन “उदानं पवनं उत्तमम् । उदानं बल उच्चते ।” बल म्हणजे फोर्स, ताकद देतो तो उदान ! आपण श्वास भरला तर ताकत वाढते आणि सोडला तर ताकत (बल) नाही. हाच उदान होय. बल, फोर्स, तेज, उर्जा याचे उदाहरण म्हणजे रेल्वे इंजिन आहे. वस्तुला जेवढी गती (हॉर्स पावर) लागते त्याला गतीचे इंजिन जोडले तर संकल्प पुर्ण होतो. त्याप्रमाणे उदानवायुच्या बलाने उर्ध्वगती, स्वर्गगती अथवा वैकुंठगती प्राप्त होते. अणुमधील इलेक्ट्रॉन म्हणजे स्थुलदेह, न्युट्रॉन-सुक्ष्मदेह, तर प्रोटॉन-कारणदेह असे वाटते. यापैकी प्रोटॉन हा ‘डीएनए’ स्वरूपात आहे. या प्रोटॉनमध्ये ‘संचित कर्म’ आहे. येथेच संकल्प, वासना आणि संस्काराचे कारण आहे. संत ज्ञानोबाराय म्हणतात,“संकल्प वासना संस्कार । हे सृष्टि रचावया कारण ।” हाच प्रोटॉन पुनर्जन्माला कारण आहे. “जैसे जिर्ण वस्त्र सांडीजे । मग नुतन वेढिजे । तैसे देहांतराते स्विकाराजे । चैतन्य नाथे ॥” हिरण्यगर्भ अथवा बिजरूपात असणारा ‘प्रोटॉन’ प्रकृतीरूपाने प्रसवतो किंबहुना तो रूपांतरित होतो. त्याचे दिसणे, न दिसणे अथवा प्रगट होणे हे विज्ञान आहे. तो प्रोटॉन अतिसुक्ष्म आहे आणि अतिविशालही आहे. महाभारतात राजा परिक्षिती विषयी एक कथा आहे. श्रृंगी ऋषींनी त्याला शाप दिला की, तु सात दिवसात सर्पदंशाने मरण पावशील. यामुळे तो अत्यंत भयभीत झाला. राजदरबारातील ‘थिंगटॅकने’ निर्णय केला की, विशाल अशा तलावात एका खांबावरील महालात परिक्षितीने राजाने रहावे. तो परिपुर्ण सुरक्षित आहे. आश्चर्य म्हणजे तरिही सर्पदंश झाला. यातील रहस्य असे की, तक्षक सर्पाने फळाच्या आत (सुक्ष्म) रूपाने प्रवेश केला. द्रव्यरूपाने राजवाड्यात पोहोचला. ‘अंति-मती स:गति’ या नियमाने त्या तक्षक सर्पाने महालात स्थुलरूप धारण करून परिक्षिती राजाला दंश केला. राजा मरण पावला. तसेच समुद्र उल्लंघन करताना बुध्दिमतां वरिष्ठं अशा हनुमंतरायाने सुक्ष्म असे लघुरूप धारण केले होते आणि विशालरूप देखील धारण केले आहे. नल, निल हे आकाश गमन करीत होते. हे रामायणातील उदाहरणे आहेत. महर्षि व्यास पुत्र शुकदेव यांनी संपुर्ण जंबुद्विपाची यात्रा केली होती. जगत्गुरू संत तुकाराम महाराजांचे कुडीसहीत गुप्त होणे, स्वर्गारोहन करणे अथवा प्रगट होणे हे वरिल दृष्टिकोनातुन पहावे लागेल. विश्वामित्रांनी स्वसामर्थ्याने त्रिशंकुला स्वर्गात पाठवले हा इतिहास आहे. याला त्यांचे रॉकेट सायन्स म्हणा की दिव्यशक्ती म्हणोत पण हे घटित आहे. म्हणुन तुकाराम महाराज म्हणतात मी गुप्त झालो आणि वैकुंठाला गेलो. हा विषय तर्कसंगत वाटतो. पटलं तर बघा नाहीतर विषय सोडून द्या. कृपा करून व्यर्थ बडबड करू नका, ही हात जोडून विनंती. याविषयी माझे “विज्ञानमुर्ती ज्ञानोबा-तुकोबा” हे पुस्तक प्रसिद्ध आहे. संत तुकाराम महाराज स्वानुभव सांगतात “अंतकाळी विठो आम्हासी पावला । कुडीसहीत झाला गुप्त तुका ॥” हा जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. अनुभवाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही.
आपला स्नेही
-श्री. दत्तात्रय पांडुरंग गायकवाड
(लेखक-संत साहित्य, पुणे)
0
3
2
9
4
9