
विविध सामाजिक जाणीवांचा नजराणा – “जाणीवगर्भ”
मनोमनी’कार प्रा. सुरेश नारायणे
मो. क्र. – ७०२०१३१०८९
——————————
असं म्हणतात की व्यक्ती समाजशील प्राणी आहे, तो समाजाला सोडून एकटा राहू शकत नाही. त्याची अंतर्बाह्य जडणघडण समाजात राहूनच होत असते. त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या वागण्या-बोलण्यावर कुणाचा ना कुणाचा तरी कमी अधिक प्रभाव असतोच. त्याच्या एकूण वर्तनावरुन त्याचे समाजातील स्थान निश्चित होते.
जसा समाजाचा बरावाईट प्रभाव त्याच्यावर पडतो तसा त्याच्याही वागण्या-बोलण्याचा समाजावर प्रभाव पडत असतो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनुकीचे समाज अनुकरण करतो,त्याच्या जवळ येतो परंतु कधी कधी तोच समाज त्याच्या स्वभावामुळे त्याच्या पासून दूरही जातो.असे असले तरी तो या समाजाचा अविभाज्य भाग असतोच. ही एक फार मोठी प्रकिया आहे,युगांपासून अविरत चालत आलेली. त्यांच्यात एक मनोव्यापार चालतो. तो कोणी सोडून देतो तर कुणी शब्दांमध्ये मांडून ठेवत असतो.
अशा व्यक्ती आणि समाज यांना आपल्या रंगात जो रंगवून घेतो तो आहे निसर्ग!..या निसर्गात नानाविध अगम्य घटना घडत असतात,ऋतूमानानुसार अनेक बदल घडत असतात. निसर्गात घडणाऱ्या विलक्षण घटना, विलक्षण बदल हे नेहमीच व्यक्तीवर आपला प्रभाव सोडत राहतात. अशा या घटना कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार यांना नकळत आपल्याकडे आकर्षित करतात, नव्हे नव्हे भुरळच घालतात. अशावेळी तो लेखक किंवा कवी त्याच्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही त्याला कवी काशिनाथ गवळी हे देखील अपवाद नाहीत. शेती मातीवर आधारित ‘बाप बळीचिया बळे’ या काव्यसंग्रहानंतर ‘जाणीवगर्भ’ हा त्यांचा समाज, निसर्ग, व्यक्ती आणि मानवी मन असे विविध आशय समर्थपणे आपल्या कवेत घेणारा दूसरा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. जे समाजाचे आहे ते समाजा पर्यंत पोहचवले पाहिजे या एकच विचाराने मी हा परीचय प्रपंच केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण ९४ कविता असून त्या वाचक मनाचा ताबा घेणाऱ्या आहेत.
आपल्या पहिल्याच कवितेत कवी जाणीवांचा जन्म कसा होतो ते नेमक्या शब्दात मांडतांना दीसतो….
जाणीवांचा जन्म होतांना..
मन आणि बुद्धीला
सोसाव्या लागतात
अपार कळा….
काढाव्या लागतात
अनेक उठाबशा,
माराव्या लागतात
अगणित येरझारा….
बसावे लागते कधी कधी
हताशपणे
दोन्ही हात मागे टेकून
एकांतात…
मग तेव्हा कुठे होते
भावभावनांची दाटीवाटी
आणि मगच होतो यथावकाश
जाणीवांचा सुलभ जन्म..!
तसेच कवी आपल्या ‘सुमनपाखरे’ या कवितेत फुलपाखरांत रमतांना म्हणतो की,
श्रावणातल्या वेल फुलांवर
सुमनपाखरे भिरभिरती
रंग लेवूनी निज पंखावर
इकडून तिकडे लवलवती
तर आपल्या ‘मालीनी’ या कवितेत स्वप्नात येणाऱ्या प्रेयसीचे अतिशय कल्पक शब्दात वर्णन करताना..
केसातील जे थेंब शिंपिते
मम मुख कमलावरी
भिजून आलीस कुठे बरसल्या
प्रेम रसांच्या सरी!
त्याच बरोबर कवी निसर्गाशी अनेक वेळा एकरूप झाल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येतो. ‘पर्वणी’ या अतिशय लयबद्ध कवितेत कवी म्हणतो..
गोजिरवाणी सकाळ सारी
वारा सळसळ करी
हिरवी हिरवी धुंद पालवी
डोले तालांवरी |
पुष्प उमलले पहा चमकले
दवबिंदू पर्णांवरी
जणू उतरले तारे नभीचे
हिरव्या कुरणांवरी |
अशा संग्रहातील एकामागून एक येणाऱ्या अनेक लयबद्ध कविता आहेत. प्रेम हा कवीचा आवडता विषय असावा म्हणून कवी प्रेम कविता लिहीताना थकत नाही. त्यांच्या ‘प्रेमपाझर’ या कवितेत कवी कबुली देतो की,
खरे सांगू सये गुंता
कधीच सुटला नाही
ह्दयातला प्रेमपाझर
कधीच आटला नाही..
अशाच ओला श्वास, अश्रू गाळते काळीज, एका अबोधाचा बोध, मला नाही होता येत, तिची लागता चाहूल, अव्यक्त, सई, तिचं नि माझ प्रेम, अशा प्रेमाबद्दल विविध भाव मांडणाऱ्या, विविध प्रतिक प्रतिमा योजलेल्या छंदोबद्ध आणि मुक्त छंदातल्या अनेक कविता आहेत. त्यांची ‘पारिजात’ ही मला आवडलेल्या कवितांतील एक अप्रतिम कविता…
हिर्व्या गर्द पानोळ्याचा
पारिजात वृक्ष वेडा
शुभ्र नाजूक फुलांचा
दाट सांडियेला सडा
तसेच ‘निशा’ या कवितेत कवी म्हणतो की,…
रात किड्यांनी गाऊन
रात जागवली सारी
सप्त सुरात चालली
रात रागिणीची फेरी…
तसेच कवी निसर्गाकडे त्यातील घटणांकडे किती सजगतेने पहातो ते त्यांच्या ‘अनुभूती माधूर्याची’ या कवितेवरुन आपल्याला दीसून येईल. निसर्गात वर्षभर अनेक बदल होत राहतात, ऋतू मागून ऋतू येतात जातात. वसंत हा तर सर्व ऋतूंचा राजा, वृक्षवेलींना नवी पालवी फुटते, पशुपक्षी प्राणी, सर्व चराचर मोहीत होतात. वसंतांतील कोकीळेचा सुस्वर तर कवीला अक्षरशः वेड लावतो……
दूर वाकड्या नाल्यात
वारा वाहतो शितल
घन आंब्याच्या बनात
गोड गुंजन पिकलं |
मन आधीच अधिर
मग झालं वेडपिसं
कानी पडता लकेर
कोकीळेची ती ओजस |
कोकीळे प्रमाणेच कवीला सुगरण देखील खूपच भावते…
खोपा विनते ठासून
जाळीदार नक्षीदार
निरखित जातो रोज
विहीरीच्या काठावर |
खाली निळेशार पाणी
वरी पारंबीचा दोर
भावाकाशी सुगरण
झोके घेई बिनघोर |
या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे कवीने काही छोट्या छोट्या काव्य कणिका विशेषत्वाने समाविष्ट केल्या आहेत. त्या छोट्या असल्या तरी त्यांनी मोठा आशय कवेत घेतला आहे म्हणूनच या काव्य कणिकांनी कवितेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, आणि म्हणूनच मला त्या खूप आवडल्या आहेत. असं म्हणतात की कमी शब्दात मोठा आशय पेलणारी कविताच खरी परीणाम देणारी कविता असते. त्यात निमित्त, हक्क, डाग, अधिकार, ओझं, जखमा, संशय आदी कवितांचा उल्लेख करता येईल. यातील’ जखमा’ ही कविता बघा..
मनाला झालेल्या
भळभळत्या जखमा
प्रवासाला नेतांना
कितीही जपल्या
काट्याकूट्यांपासून तरी
ओरखडे पडल्याशिवाय
राहतच नाहीत
अगदी..
खपल्या धरल्यावरही…!
आणि ‘संशय’ या कवितेत कवी लिहितो..
जेव्हा एखाद्याची शंका
संशय बनते
तेव्हा ती अधिकच उग्र नि..
आक्राळ विक्राळ होत जाते
करत राहते स्वाहा..
कष्टाने जोडलेले नातेगोते,
प्रेमाने जपलेले हितसंबंध अन्
पैजेवर जिंकलेले
संसारही…!
अशाच सामाजिक जाणीवा आणि आशय असलेल्या अनेक कविता आहेत त्यात नशा, गुंतवणूक, साक्ष, निषेध, हसणे, हे निर्भये, निदान तुम्ही तरी, बहर, बेगडी वेसन, त्याचं मरण, फुंकर आदी कविता असून त्या सर्व वाचणीय झाल्या आहेत. ‘त्याचं मरण’ या कवितेत कवी म्हणतो..
त्याच्या मरणाचं मोठ
राजकारण झालं
कुणी समर्थन तर
कुणी भांडवल केलं…..!
कुणी केले संप नि..
कुणी काढला मोर्चा
गल्ली पासून दिल्ली पर्यंत
रंगत गेल्या चर्चा…!
तसेच सोबतीचा अंधार, कोवळी कळी, ओंजळीतलं दुःख, दक्ष, हे पाखरांनो, अंनताचा प्रवास आदी कवितांमधून समाजातील अनेक चालीरीती, रुढी, परंपरा यांवर कोरडे ओढले आहेत. त्यांच्या ‘संस्कृती’ या कवितेने समाजातील फार मोठे वास्तव वाचकांसमोर मांडले आहे..
शहराची संस्कृती
अन फॅशनची विकृती
खेड्यापाड्यात
शिरु र्हायली..
आचार विचारांवर
साध्या सुध्या संस्कारांवर
चटकन घर
करु र्हायली…!
दारात गाड्या
वावरात माड्या
बॅंकांचे कर्जे
काढू र्हायली…
घरात ए. सी.
बाहेर देशी
निती नि नियम
मोडू र्हायली…!
अशा अनेक आशयघन कवितांनी सजलेल्या या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांची आभ्यासपूर्ण व विस्तृत प्रस्तावना लाभली आहे.संग्रहाला कवी व चित्रपट गीतकार विष्णू थोरे यांचे नावाला साजेशी असे आकर्षक मुखपृष्ठ लाभले असून प्रकाशक कवी संदीप देशपांडे यांच्या सिद्धी प्रकाशन ची मेहनत संग्रहाच्या मजबूत बांधणीवरुन ठळकपणे जाणवते. काव्यसंग्रहातील काही कवितांतून नवखेपणा जाणवत असला तरी भविष्यात कवी काशिनाथ गवळी मराठी साहित्यात मोलाची भर घालतील यात शंका नाही, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!.