ई-पेपरमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक
विंचूरची संघर्ष कन्या कॅप्टन गौरी महाडिक

0
3
2
1
2
3
विंचूरची संघर्ष कन्या कॅप्टन गौरी महाडिक
संदीप शिरसाट, विंचूर ::-
एके काळी चुल आणि मुल याच्यातच अडकलेली स्त्री घरा बाहेर पडली शिक्षीत झाली. आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू लागली. पुरुषांची मक्तेदारी असलेले अंतराळ क्षेत्र असो अथवा सैन्य दलही याला अपवाद राहिले नाही. दृढ निश्चय व स्वकर्तृत्वाने भारतीय सैन्य दलात कॅप्टन सारख्या उच्च पदाला गवसणी घालणारी विंचूरची संघर्ष कन्या कॅप्टन गौरी
महाडिकची संघर्षगाथा-
मुळचे विंचूरचे रहिवासी असलेले व नोकरी निमित्त कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या शशिकांत विठ्ठल पवार व उषा शशिकांत पवार या दाम्पत्याची गौरी महाडिक ही द्वितीय कन्या. गौरीने कॉमर्स शाखेच्या पदवी बरोबरच सी.एस.व एल.एल.बी.या पदव्या घेऊन मुंबई येथे एका कॉर्पोरेट कंपनीत कंपनी सेक्रेटरी सारखे उच्च पद व उत्तम पगाराची नोकरी मिळवली. उच्च शिक्षित व उच्च नोकरी असलेल्या गौरीचा विवाह दि.१५ फेब्रुवारी २०१५ रोजी विरार येथील मेजर प्रसाद महाडिक यांच्याशी थाटामाटात झाला. प्रसाद महाडिक हे भारतीय सैन्य दलात ७ बिहार रेजिमेंटचे मेजर म्हणून अरुणाचल प्रदेशात भारत चीन सिमेवर तैवांग येथे कार्यरत होते. मनासारखे जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदी होते. व आपल्या सुखी संसारात रममाण झाले होते. मात्र नियतीला हे सुख बघवले नाही. विवाहानंतर अवघ्या अडीच वर्षांतच दि.३० डिसेंबर २०१७ रोजी भारत चीन सिमेवर झालेल्या एका दुर्घटनेत मेजर प्रसाद महाडिक यांना विरमरण आले.आणि गौरीवर दुखाचा डोंगर कोसळला. गौरीचे सुखी संसाराचे स्वप्न भंग पावले.पती शहिद झाल्या नंतर समाजाकडून गौरीला वीर पत्नीचा बहुमान मिळण्या ऐवजी अवहेलना वाट्याला येऊ लागली. वास्तविक सैन्यातील जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत.वीर पत्नींच्या बलिदाना मुळेच महिलांचे सौभाग्य अबाधित आहे. तरी देखील समाजा कडून गौरीला विधवा किंवा श्रीमती म्हणून हिणवले जाऊ लागले. हळदी कुंकू अथवा इतर सण समारंभांना बोलावणे टाळले जाऊ लागले. यामुळे जिद्दीला पेटलेल्या गौरीने स्वतःला सावरले. आणि पतीचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय सैन्य दलात जाण्याचा मनाशी निश्चय केला व त्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.
गौरीने कंपनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा देऊन भारतीय सैन्य दलाची सर्विस सिलेक्शन बोर्डाची (एस.एस.बी.)ही परिक्षा दिली. पहिल्या वेळेस तिला अपयश आले.परंतु पतीची वर्दी परिधान करण्याचा चंग बांधलेल्या गौरीने दुसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक पटकावला.व चेन्नई येथे ऑफीसर ट्रेनिंग अकॅडमीत ४९ आठवड्यांची खडतर ट्रेनिंग घेऊन ७ मार्च २०२० रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाली.व आज कॅप्टन होऊन ड्रोन पायलट म्हणून भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत आहे.
एकदा दिवटी वरुन घरी आलेल्या मेजर प्रसाद महाडिक यांची टोपी सहजच गौरीने घातली होती. तेव्हा कडक शिस्तीच्या मेजर प्रसाद महाडिक यांनी गौरीला ही टोपी घालण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, रक्ताचे पाणी करावे लागते. तुला ही टोपी घालण्याची एवढीच इच्छा असेल तर तु ही मेहनत कर आणि सैन्यात भरती हो मगच ही टोपी घाल असे रागावून सांगितले होते. गौरीने पतीच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करुनच शहिद पती प्रसाद महाडिक यांना श्रद्धांजली अर्पण केली. शहिद प्रसाद महाडिक यांचे अस्तित्व गौरीच्या रुपाने आजही जिवंत आहे.
तसे बघितले तर कॉर्पोरेट कंपनीतील भरघोस पगाराची नोकरी व विरार सारख्या शहरात असलेला फ्लॅट एवढ्या वरही गौरीला सुखी जीवन जगता आले असते. मात्र पतीच्या देशप्रेमाने प्रेरीत झालेल्या गौरीने पतीचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास घेतला होता.ध्येय पुर्ती करतांना आलेल्या अनेक संकटांचा सामना करीत गौरीने जिद्दीने आपले ध्येय साध्य केले.जीवनात संघर्षाला पर्याय नाही.संघर्ष मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशोशिखर गाठता येते. हेच गौरीने सिद्ध केले.
0
3
2
1
2
3