गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक
नांदगाव तालुक्यात तरुणाचा खून; पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल, चौघांना अटक

0
3
2
1
2
1
नांदगाव (मारुती जगधने) :
नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात किशोरवयीन तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे (वय १७, रा. बोधे दहिवाळ, ता. मालेगाव, जि. नाशिक) या तरुणाचा पूर्व वैमनस्यातून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पाच संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित एका संशयिताचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे वाखारी परिसरात खळबळ उडाली असून, चार वर्षांपूर्वी याच भागात एका कुटुंबातील चार जणांचा खून झाल्याची आठवण स्थानिकांच्या मनात पुन्हा ताजी झाली आहे.
फिर्यादी दीपक दशरथ अहिरे (रा. बोधे दहिवाळ, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे आणि रवींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरेवाडी साकोरी झाप, ता. मालेगाव) या पाच संशयितांनी संगनमत करून दिनांक २३ एप्रिल २०२५ सायंकाळी ते २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वाखारी शिवारात रवींद्र याच्यावर शारीरिक मारहाण करत धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून केला. खून केल्यानंतर संशयितांनी मृतदेह घटनास्थळी टाकून पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व गुन्हा नोंदवला.
पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहायक निरीक्षक संदीप बडे आणि उपनिरीक्षक बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयितांना अटक केली आहे. पाचव्या संशयिताचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तर्कवितर्क आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस कसून तपास करत आहेत.
0
3
2
1
2
1