
‘शिवशाही’ मागचं शुक्लकाष्ठ संपेना; अख्खी बस आगीत जळून खाक,
शिवशाही बसच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीये. आता शिवशाही बस आगीमध्ये जळून खाक झाली आहे. धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर शिवशाही बसला आग लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ ही घटना घडली आहे. शिवशाही बस या आगीत जळून पूर्णपणे खाक झाली आहे, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही शिवशाही बस धुळ्याकडून शिरपूरकडे जात होती. शिवशाही बसला नेमकी आग का लागली? याचे कारण अजून समजू शकलेलं नाही.
बसला आग लागल्याचे समजताच सगळे प्रवासी आणि ड्रायव्हर तत्परतेने गाडीच्या बाहेर पडले. लगेचच अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली, पण ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण शिवशाही बसचा आगीत कोळसा झाला. बसला लागलेल्या या आगीमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅफिकही झाला होता.
शिवशाहीचं चाक थांबणार?
काहीच दिवसांपूर्वी गोंदियामध्ये शिवशाही बसचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात अनेक ठिकाणी याआधी शिवशाही बसचे अपघात झाले आहेत. बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचंही आढळून आले.त्यानंतर आता तरी राज्य परिवहन महामंडळ शिवशाहीला ब्रेक लावणार आहे का? असा सवाल प्रवाशी करत आहे बसमधील तांत्रिक दोष समोर आल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेतला जाऊ शकतो का? याकडे आता लक्ष लागले आहे.