बिटको महाविद्यालयाचे हिंगणवेढे येथे रासेयोवतीने आयोजित श्रमसंस्कार शिबीराची सांगता…

नाशिकरोड : ” राष्ट्र उभारणीत एनएसएस स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका असते. त्यातून नेतृत्व गुण विकसित होते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण होऊन त्याद्वारे व्यक्तिमत्व विकास घडतो तसेच समाजसेवेच्या माध्यमातून विशेष उपक्रमातून संस्कार घडतो. एनएसएस श्रमसंस्कार शिबिर हे व्यक्ती समाज परिवर्तनाचे एक माध्यम असल्याचे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनावतीने आयोजित दि. २७ जानेवारी पासून हिंगणवेढे ता. जि. नाशिक येथे सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिराच्या दि.२ फेब्रुवारी रोजी झालेल्या समारोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. राम कुलकर्णी यांच्यासह कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ आकाश ठाकूर, सरपंच सौ. ज्योती नागरे, उपसरपंच सौ. उषाताई वाघ, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, हभप क्षीरसागर महाराज, संगीता धात्रक, साहेबराव धात्रक, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. दीपक टोपे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात दररोज सकाळच्या सत्रात योगा व आसनानंतर जलसंवर्धन व जलस्रोत स्वच्छता, मतदान जनजागृती व सर्वेक्षण , वृक्ष लागवड व संगोपन जनजागृती, गावातील वृक्षांना चुना वगैरे लावून सुशोभीकरण केले तसेच मंदिर व परिसर स्वच्छता श्रमदान , गावात रॅली काढून जनजागृती यासह महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती, संविधान जनजागृती यासह स्वच्छता व वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी गावात शाळेत व उपस्थित पाहुण्यांसमोर निवडणूक’ साक्षरता ‘ या विषयावर पथनाट्य सादर केले . कु. स्नेहल भालेराव यांनी स्वागत गीत म्हटले. या सात दिवसीय शिबिरातील दुपारच्या सत्रात उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , प्रा. नरेश पाटील, डॉ. शशिकांत सावळे, डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. साहेबराव निकम, ज्ञानेश्वर भोर, डॉ.संदीप चव्हाण, योगेश क्षीरसागर या तज्ञांची विविध विषयांवर व्याख्यान झाल्याची माहिती डॉ. संतोष पगार यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांशी सुसंवाद करताना गावातील ग्रामीण जीवनाचा अनुभव जवळून बघायला मिळून शिबिराद्वारे योग्य संस्कार मिळतात असे सांगितले. शिबिरात एकूण १२० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या शिबिरात विद्यार्थी विद्यार्थिनींनीच स्वयंपाक बनवून विविध समित्या बनवून रोजचे संयोजन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधाकर बोरसे यांनी तर प्रास्ताविक डॉ. कांचन सनानसे यांनी तसेच आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ संतोष पगार यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. चंद्रकांत तारू, ज्योती पेखळे, सुजाता टोचे, गायत्री हरळे, नरेश पाटील,वसीम बेग, आकाश लव्हाळे यांनी प्रयत्न केले. संकेत पोरजे व समीक्षा गुठाळ यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हिंगणवेढे गावच्या वतीने नाशिकरोड महाविद्यालयाला चषक प्रदान केला व उत्कृष्ट सहकार्याबद्दल आभार मानले. प्रतिनिधिक स्वरूपात काही स्वयंसेवकांनी मनोगते व्यक्त करताना ग्रामीण भागातील जनजीवनाचा अनुभव व शिबिरातील विविध उपक्रमांचा, तज्ञ व्याख्यानांच्या मार्गदर्शनाचा आम्ही भावी जीवनात नक्कीच उपयोग होईल असे सांगितले.