विंचूर :
पदवी स्तरावरील अभियांत्रिकी अर्थात इंजिनियरिंग साठी राज्य शासनाच्या वतीने सीईटी परीक्षा घेण्यात येते. बारावीनंतर इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्यासाठी जेईई किंवा राज्य शासनाची एमएचसीईटी पीसीएम ही पात्रता परीक्षा अनिवार्य असते. येथील रोशन नितीन गायकवाड याने बारावी बोर्ड परीक्षेनंतर मिळालेल्या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत कोणताही क्लास न लावता घरीच सेल्फस्टडी व युट्युब वरून अभ्यास करीत रविवारी(दि.16) जाहीर झालेल्या सीईटी परीक्षेच्या निकालात 98.81 पर्सेंटाइल गुण मिळवत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
सीईटी परीक्षेतील आधारित गुणांवर टॉप कॉलेजेस व ब्रँचला प्रवेश मिळत असल्याने बहुतांश विद्यार्थी दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी फक्त प्रवेश घेऊन सीईटी अभ्यासाला प्राधान्य देतात.भविष्यातील टर्निंग पॉईंट म्हणून या पात्रता परीक्षांकडे पाहिले जाते. यासाठी ग्रामीण भागासह शहरात लाखो रुपये खर्चून क्लासेस लावले जातात. परंतु रोशन याने अकरावी बारावी दोन वर्ष नियमित स्टेट बोर्डचा अभ्यास करीत बारावी बोर्ड परीक्षेत 86.33% गूण मिळवून विंचूर केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. स्टेट बोर्डचे दोन वर्ष झाल्यानंतर सिईटीसाठी अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत दररोज आठ ते दहा तास अभ्यास करीत सातत्य ठेवले. परिणामी रविवारी (दि.16) जाहीर झालेल्या निकालात त्याने अव्वल क्रमांक मिळविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शहरात जाऊन क्लासेस केले तरच यश मिळते या संकल्पनेला छेद देत जिद्द, चिकाटी व ध्येय ठेवल्यास ऑनलाईन युगात मोबाईलचा सकारात्मक वापर करून घरी अभ्यास करूनही निश्चित यश मिळू शकते हेच त्याने सिद्ध केले आहे.
बारावी बोर्ड परीक्षेनंतर सीईटी अभ्यासासाठी कमी दिवस हातात होते. परंतु मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तसेच युट्युबची मदत घेत घरीच अभ्यास केला – रोशन गायकवाड, विंचूर